आमीरच्या "सत्यमेव जयते" बद्दल भरपूर चर्वितचर्वण झालंय आता. त्याच्या पहिल्या लग्नावरून, मुस्लीम असण्यावरून झालेला विरोध फारंच खेदजनक वाटला. तसंच त्याला मिळालेली लोकप्रियता खुष करून गेली! असं वाटलं की एवढा वेळ, इतक्या क्लिष्ट विषयावर घडणारी चर्चा लोक आवडीने बघतायेत, समर्थन करताहेत...हेही नसे थोडके!
तरी काही गोष्टी आहेत...ज्या आपण भाबडे भारतीय नेहेमी दुर्लक्षित करतो. त्या गोष्टींवर पहिल्याच भागानंतर मत प्रदर्शित करणं जरा घाईचं वाटलं. पण दुसरा भाग बघितल्यानंतर लिहिण्याचा मोह अनावर झाला!
"सत्यमेव जयते" हा शो आमिरने दाखवणं चांगलं की वाईट ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेऊन..."सत्यमेव जयते" आणि आमीर ची तिसरी बाजू बघुया.
सर्वप्रथम आमीरचं "मी समाजसेवक नाही...अभिनेता आहे..." हे म्हणणं.
हे असं म्हणणं चूक अजिबात नाही. एक अभिनेता (आणि निर्माता) म्हणून त्याने जे धाडस दाखवलं त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. पण वरील विधान करून, त्याने जबाबदारी झटकून टाकली! वरील वाक्य करून, त्याने हे अगदी बेमालूमपणे हे स्पष्ट केलं की सरकारच्या चुकीच्या धोरणांवर, बेजबाबदार वर्तनावर तो काहीच बोलणार नाही...करणार नाही.
हे आमीरमधल्या अभिनेत्याने केलं ह्यात काहीच गैर नाही. पण हे त्याच्या "देशाचा खरा हिरो" बनण्याच्या प्रयत्नातला धूर्तपणा-फोलपणा दाखवणारं आहे. हा हिरो फक्त "गरजणारा" आहे..."बरसणारा" नाही!!
(...परत बोलतो...त्याने हे करणं चूक नाही...पण तो मोठी जबाबदारी टाळतोय असं वाटतं...इतकंच.)
(...परत बोलतो...त्याने हे करणं चूक नाही...पण तो मोठी जबाबदारी टाळतोय असं वाटतं...इतकंच.)
दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट...
दोन्ही भाग फारच क्लिष्ट, नाजूक विषयांवर होते. ते ज्या हळुवारपणे दाखवले, चर्चिले गेले...वाह...लाजवाब!
खूप अभ्यास करून...सरकारी आकडे, स्वतः संशोधन करून मिळवलेले तथ्य...ते सिद्ध करणारे आकडे...सगळंच थक्क करणारं आहे.
आमीर जितक्या प्रेमाने, आपुलकीने, पोटतीडकीने समस्यांबद्दल बोलतो ते सुद्धा खूप सुखद वाटतं.
पण प्रश्न आहे तो त्याने दिलेल्या समस्या-समाधानाचा.
आपल्या समाजामध्ये काही "Over Optimistic" लोक आहेत...हे लोक एक भोळा आशावाद बाळगून असतात.
हे लोक म्हणतात भारताच्या समस्या तेव्हाच सुटतील जेव्हा "सगळे लोक" चांगले होतील...!
उदाहरणार्थ...सगळ्यांनी भ्रष्टाचार थांबवा म्हणजे प्रश्नच सुटेल...तुम्ही पैसे देऊच नका म्हणजे घेणारा मागणारच नाही...! किती हास्यास्पद उपाय आहेत हे? भ्रष्टाचार "देणार्यामुळे" होतो की "घेणार्यामुळे" ? तातडीची गरज असणाऱ्याला कुणी काम करून देण्यासाठी पैसे मागितले आणि “पैसे दे नाहीतर गेला उडत” असं म्हटलं तर कुठला पर्याय रहातो?
अश्या कुठल्या भोळ्या आशावादावर जगणं म्हणजे...रामराज्य हवंय...शिवशाही हवीये...पण श्रीरामांच्या , शिवरायांच्या राज्यनिर्माणासाठी मेहेनत घ्यायला नकोय असं आहे.
मुळात समाज “चांगला”च असतो. समस्या निर्माण होते मुठभर असणाऱ्या गुंडांमुळे. त्यांना जरब बसवण्यासाठी असायला हवेत चांगले कायदे, नियम...आणि त्यांची अंमलबजावणी करणारी व्यवस्था!!!
आमिरने दोन मुद्दे प्रस्तुत केले. दोन्ही वेळा वकिलांनी, कार्यकर्त्यांनी हे सांगितलं की आपली न्यायव्यवस्था किती निर्लज्जपणे परिस्थितीचा, पिडीतांच्या हतबलतेचा फायदा घेऊन दोषींना मोकळं सोडते.
आमिरने शेवटी दोन्ही समस्यांवर दोन उपाय सांगितले.
१...आपण ठरवा...तुम्ही ठरवा की तुम्ही असं करणार नाही...आणि आपल्या माणसांची काळजी घ्या...!
२...आमिर सरकारला पत्र पाठवेल, तुम्ही sms करा...आणि ते सर्व सरकारला कळवलं जाईल...!
उपाय १ योग्यच आहे. आणि हीच गोष्ट ह्या "शो"चा फायदा दाखवणारी आहे. लोकांनी जागृत होणं आवश्यकच आहे. पण ते पुरेसं मात्र नाही.
उपाय २ पुरेसा आहे? ह्याने सरकार ऐकेल? ही गोष्ट सरकारवर दबाव आणण्यासाठी पुरेशी आहे का?
कुठलाही समाज पुढे तेव्हा येतो जेव्हा त्या समाजातले प्रसिद्ध लोक आपल्या प्रसिद्धीचा वापर सरकारवर दबाव आणून चांगले कायदे आणण्यासाठी करतात...आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करून घेतात.
पहिल्या एपिसोड मध्ये आमीर ने Fast Track court ची मागणी केली. अन् दुसऱ्यामध्ये एक कायदा पास करण्याची.
ज्या न्यायव्यवस्थेने आधी सगळ्या केस वेगळ्या केल्या...(म्हणजेच ती व्यवस्था चांगलीच भ्रष्ट आहे)...त्याने ही मागणी मान्य करणं शक्य आहे का? जरी मान्य केली...तरी अशी भ्रष्ट व्यवस्था न्याय देईल?
हे डॉक्टर असा अवैध धंदा करतात....ते पोलीसांच्या मदतीशिवाय शक्य आहे का? न्यायालयात सिद्ध कोण करणार आहे हे सगळे गुन्हे?
मुलांच्या लैंगिक शोषणाची समस्या दिसते तेवढी सोपी-खाजगी नाही. ज्यांनी पेज-३ चित्रपट बघितला असेल त्यांना थोडीशी कल्पना असेलंच. कित्येक बालसुधार गृह, अनाथाश्रम, झोपडपट्ट्या ह्या समस्येचे शिकार आहेत. आणि अर्थातच...मोठ मोठी मंडळी ह्यात सामील आहेत. सरकार हे सगळं थांबेल “असा” कायदा आणेल का? त्यात पळवाटा नसतील? सरकार आपलं सामन्यांचं ऐकेल की ह्या "बड्या" मंडळींचं...ज्यांच्या पैस्यावर निवडणुका लढवल्या जातात?
आज मोठ मोठे गुन्हे केलेले---भ्रष्टाचार, आतंकवादला मदत-अश्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले मस्तपैकी मोकळे हिंडतायेत. मग ह्या गुन्हेगारांचं काय?!!!
हे दोन मुद्देच नाही...आपल्या समोरच्या प्रत्येक समस्येचं समाधान इथेच अडतं!
कायद्याची अंमलबजावणी होत नाही! कारण कायद्यात पळवाटा असतात! त्यावर काय करावं?
ह्या साध्या प्रश्नांची उत्तरं आमीर देत नाही! हे प्रश्न त्याच्या मनात आले नसतील असं शक्यच नाही!
पण ह्या प्रश्नांना...हुशार आमीर एकदम छान बगल देतो...
आणि आपल्याला म्हणतो...
“उपासमारीने, तहानेने व्याकुळलेल्या माझ्या मित्रांनो...जा...शेती सुरु करा...! विहीर खणा...! त्यासाठी जमीन तुम्हीच शोधा...सरकारकडून परवानगी तुम्हीच मागा...
मी समर्थनाचं पत्र लिहितो...!!!”
---
---
ब्लॉगचा सारांश सांगतो:
१...मला "सत्यमेव जयते" जाम आवडला!!!
२..."सत्यमेव जयते" मुळे मला आमीर अजून जास्त आवडू लागला आहे...!
३...असेच...जरा प्रबोधनाचे शो करून त्याने अधिकाधिक पैसे कमवावे अशी माझी खरोखर मनोमन इच्छा आहे!
४...पण...
तो जे करतोय ते फक्त "नाजूक समस्यांवर प्रकाश टाकणं" इतकंच आहे, त्याने सांगितलेले समस्या समाधानाचे मार्ग अजिबात पुरेसे नाही. ही जाण सुजाण नागरिकांनी ठेवावी....आणि मूळ प्रश्नावर समाधान शोधावं...!
१...मला "सत्यमेव जयते" जाम आवडला!!!
२..."सत्यमेव जयते" मुळे मला आमीर अजून जास्त आवडू लागला आहे...!
३...असेच...जरा प्रबोधनाचे शो करून त्याने अधिकाधिक पैसे कमवावे अशी माझी खरोखर मनोमन इच्छा आहे!
४...पण...
तो जे करतोय ते फक्त "नाजूक समस्यांवर प्रकाश टाकणं" इतकंच आहे, त्याने सांगितलेले समस्या समाधानाचे मार्ग अजिबात पुरेसे नाही. ही जाण सुजाण नागरिकांनी ठेवावी....आणि मूळ प्रश्नावर समाधान शोधावं...!